Monday, November 2, 2015

दशक्रिया - बाबा भांड

’दशक्रिया’ ही भानुदास नावाच्या एका शाळकरी मुलाच्या आयुष्याची कहाणी आहे. बुध्दी, चातुर्य व साहस पणाला लावून पोटाची खळगी भरू पाहणाऱ्या,  दारिद्रयाने ढासळून गेलेल्या आपल्या कुटुंबाला आधार देण्याचे स्वप्न पाहणाऱ्या भानुदासची ही कहाणी हळूहळू विस्तारत जाते; आणि रोगट रुढींमुळे धर्माला आलेली अवकळा, विदारक जातिव्यवस्था, अर्थार्जनाचे एकाच वेळी संतापजनक व करुणाजनक वाटणारे पर्याय, पार कोलमडलेली कुटुंबव्यवस्था, उच्च-नीच अश्या अनेक वर्णांना व वर्गाना पोटासाठी एकाच पातळीवर आणणारी विचित्र समाजस्थिती, आधुनिकीकरणाकडे पाठ फिरवणारे समूह, मानवी नात्यांचे पैशामुळे पटापट बदलत जाणारे रंग, मृत्यू आणि धर्माबाबतचे चिंतन, सोनेरी इतिहासाचे सडलेले कातडे अंगावर ओढून सुस्त पडलेली नगरी इत्यादी असंख्य गोष्टींना कवेत घेऊन सद्य:स्थितीचा क्लेशदायक दस्तऎवज बनते.



तटस्थ-वास्तवदर्शी शैलीमुळे, खोट्या काव्यात्मतेला जाणीवपूर्वक दूर ठेवण्यामुळे, सहज-ओघवत्या अचूक बोलभाषेमुळे अस्सल मराठी व मितव्ययी शब्दकळेमुळे, चित्रसदृश वर्णनांमुळे, आशयाशी अंगभूत झालेल्या चिंतनामुळे आणि जगण्यातून आलेल्या निश्चित वैचारिक भूमिकेमुळे बाबा भांड यांची ही कादंबरी आपल्या समकालीनांच्या साहित्यापेक्षा वेगळी व वैशिष्ट्यपूर्ण झाली आहे. शिवाय कुमारापासून प्रौढांपर्यंतच्या सर्वच वाचकांना प्रभावित करण्याची अद्‍भुत क्षमता तिच्यात आलेली आहे. वास्तवाला हल्ली जी भयंकर अवकळा प्राप्त झाली आहे, ती लक्षात घेता, ’दशक्रिया’ ही कादंबरी हा एक मौलिक अपवादच म्हणावा लागेल. या अपवादाचे नाते साने गुरुजींच्या विशाल मानवी करुणेने निर्माण केलेल्या वाङ्‍मयीन प्रवाहाशी आहे.




-चंद्रकांत पाटील


वाचण्यासाठी : http://www.sahityasampada.com